Friday, 27 December 2019

सूर्यकोर

सूर्यकोर
- शंतनु शिंदे

ईमेल- shantanuspune@gmail.com
फोन नं. 7887881031


२६ डिसेंबर २०१९ ला सकाळी फक्त ह्या गोष्टीसाठी मी लवकर उठलो. परत झोप येत होती पण मी आवरून तयार झालो. वातावरण ढगाळ होतं... भुरभूर पाऊस पण पडत होता. त्यामुळं मी आणि माझी आई आम्ही दोघं उशीरा घराबाहेर आलो. साधारण वीस-पंचवीस मिनिटांत आम्ही बालगंधर्वच्या पुलावर आलो. बराच वेळ थांबल्यावर, बराच वेळ 'आज काय खरं नाही', 'ढगांमुळं काय दिसत नाही' म्हटल्यावर शेवटी आम्हाला ते दिसलं...

ग्रहण, सूर्यग्रहण (Solar Eclipse)! तेच ते, ज्याच्याबद्दल आपल्या समाजात भयंकर गैरसमज, अंधश्रद्धा आहेत. ग्रहण बघायचं नाही, ग्रहण सुटल्याशिवाय अंघोळ करायची नाही, ग्रहण सुटल्यावर मंदीर, घर, धुवायचं, प्रेगनन्ट बायकांनी ग्रहण बघायचं नाही आणि असं बरंच काही.

मी जिथं राहतो, पुण्यात, तिथून खंडग्रास ग्रहण दिसलं. ०८ः०४ ला ग्रहण सुरू झालं. ०९ः२३ ला सूर्य चंद्रानं जास्तीत जास्त झाकला गेला. १०ः५७ ला ग्रहण संपलं. बराच वेळ सूर्य ढगाआड लपला होता. साधारण ०९ः२५ ला सूर्य थोडा थोडा दिसायला लागला आणि आम्हाला फिल्टरशिवाय ग्रहण बघता आलं. सूर्य ढगांमुळं काही वेळ इतका माईल्ड दिसत होता, की फिल्टरमधून काहीच दिसत नव्हतं. फिल्टरशिवाय ग्रहण दिसत होत. थोड्या वेळाने तो बराच ब्राईट झाला, आणि मग आम्हाला फिल्टर वापरावा लागला.

ग्रहण बघण्यासाठी माझी आई आणि मी आदल्या दिवशीपासूनच खूप एक्साईटेड होतो. मी ग्रहण पहिल्यांदाच प्रत्यक्ष बघणार होतो. फोटोज खूप बघितले होते, पण प्रत्यक्ष डोळ्यांनी ग्रहण बघण्याचा जो अनुभव आहे ना, तो सगळ्यांत भारी...

कधी कधी ग्रहणाबद्दल अंधश्रद्धा बाळगणाऱ्या लोकांबद्दल मला खूप वाईट वाटतं. ग्रहण ही एक अवकाशीय आणि दुर्मीळ घटना आहे. सूर्य आणि पृथ्वीच्या मधे जेव्हा चंद्र येतो, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, आणि त्यामुळंच सूर्य कधी कंकणाकृती, तर कधी खंडग्रास दिसतो. असा सूर्य बघणं म्हणजे सूख असतं. ग्रहण बघितल्यानं कसलाही त्रास होत नाही, आणि नीट काळजी घेतली, तर डोळ्यांना पण त्रास होत नाही.

तेव्हा गैरसमज, अंधश्रद्धा बाजूला ठेवा, सूर्य ग्रहण आणि चंद्र ग्रहणाविषयी माहिती घ्या, आणि पुढच्या वेळी ग्रहण नक्की बघा!

येणारं चंद्रग्रहणः १० जानेवारी २०२०
सुरूवातः २२ः३७
शेवटः ०२ः४२

पुढचं सूर्यग्रहण- २१ जुन २०२०
सुरूवात- १०ः०२
शेवटः १३ः३०

- शंतनु शिंदे

ईमेल- shantanuspune@gmail.com
फोन नं. 7887881031

Sunday, 13 October 2019

पुणे वेध २०१९ : असिता सेन व अनिश सेन

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

पुढचं सत्र होतं अनिश नाथ आणि असिता नाथ याचं. दोघांनी लखनौ जवळच्या पश्चिम नावाच्या गावात “गुड हार्वेस्ट स्कूल” नावाची मुलींसाठी शेतीचं शिक्षण देणारी भारतातील पहिली प्राथमिक शाळा सुरू केलीये. आणि विशेष म्हणजे दिल्लीतली चांगली, भरपूर पैसे देणारी नोकरी सोडून दोघं त्यांच्या आवडत्या क्षेत्रात आहेत. त्यामुळं शाळा का सुरू करावीशी वाटली हा प्रश्न आहेच, पण त्यांना आधी विचारण्यात आलं, की तुम्हाला नोकरी सोडावीशी का वाटली?

अनिश नाथ म्हणाले, की त्यांच्या कंपनीत काम करणारे सगळे सिनिअर्स हे खूप स्ट्रेसमधे असायचे. त्यांच्याकडे बघून असं वाटायचं, की आपल्याला प्रमोशन मिळाल्यावर आपण पण असंच स्ट्रेस खाली वावरणार का? हे लक्षात आल्यापासून त्यांनी ठरवून टाकलं, की आपण एखाद्या गावात जाऊन शेती करायची. त्यांनी पटकन निर्णय घेतला, आणि लखनौजवळच्या ‘पश्चिम’ नावाच्या गावात २ एकर जागा घेतली.

आता हे गाव म्हणजे काही त्यांचं मुळचं गाव नव्हे. त्यामुळे तिथं रहायचं म्हणजे ओळखी बनवण्यापासून सुरूवात होती. असं सगळं होत असताना, त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या, पहिली गोष्ट, इकडची बरीचशी मुलं मुली कुठंही शिकायला जात नाहीत. बरीचशी घरकामातच मदत करतात, छोट्या भावंडांना संभाळतात, गुरं चरायला नेतात, इकडं तिकडं हिंडतात. दुसरी, इकडच्या तरूण लोकांना शेती करायची अजिबात इच्छा नाही. प्रत्येकाला शहरात जायचं आहे. गावात खूप कमी लोक आहेत की ज्यांना शेती करायची आहे. ह्या दोन्ही गोष्टी बघून अनिश आणि असिता ह्यांना वाटलं, ह्या लोकांना शिक्षण तर मिळालं पाहिजे, तसंच तरूण लोकांनी शेती सुरू करावी, म्हणूनही काहीतरी केलं पाहिजे. ह्या गावात शेती जरा जुन्या पद्धतीने होते. इतर ठिकाणी एका वर्षात ३ पिकं काढली जातात. पश्चिम गावात एका वर्षात एकच पिक काढलं जातं. त्यामुळं त्यांना शेतीतल्या नविन पद्धती शिकवणं भाग होतं. त्यासाठी शाळा काढली पाहिजे.

मग त्यांनी गावकऱ्यांना समजावायला सुरूवात केली. गावकऱ्यांना वाटायचं की हे आपल्याला शेती काय शिकवणार? अजुन काय शिकायचंय? इतकी वर्षं शेती तर करतोय… असे भरपूर प्रश्न असायचे. मुलांना काय शिकवणार? शाळा कुठे भरवणार? बिल्डिंग नाही तर शाळा कशी भरवणार?

अशा सगळ्या प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली. थोडा विश्वास बसल्यावर त्यांनी काही मुलींना पाठवलं. पहिल्यांदा एकूण ६ मुली होत्या, पण सध्या वाढत वाढत संख्या ४६च्या वर गेलीये. २०१६ साली त्यांनी गूड हार्वेस्ट स्कूल चालू केली. २०१४ साली अनिश आणि असिता नाथ या गावात राहायला आले होते.

त्यांना विचारण्यात आलं, की त्यांनी फक्त मुलींची शाळा का काढली? मुलींना शेतीचं शिक्षण द्यायचं का ठरवलं? सर्वसाधारणपणे आपण बघतो, की शेतकरी पुरूष असतात. मग फक्त मुलींना शेतीचं शिक्षण का?

त्यांनी सांगितलं, हा दृष्टिकोन थोडा चुकीचा आहे. आपल्याला ट्रॅक्टर चालवताना किंवा काही ठराविक कामं करताना पुरूष दिसतात, म्हणून आपण म्हणतो की शेतकरी पुरूष असतात. खरंतर शेतीतली बरीच कामं स्त्रिया करतात. शेतातली बरीच कामं अशी असतात, की जी फक्त स्त्रियाच करू शकतात. त्यामुळे त्यांना शिक्षण मिळणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं होतं.

ह्या शाळेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, ह्या शाळेत इयत्ता नाहीत. इकडच्या अगदी लहान मुलीपासून १५ – १६ वर्षांच्या मुलींपर्यंत सगळे एकत्रच शिकतात. प्रत्येकाचा शिकण्याचा कल, वेग वेगवेगळा असू शकतो. त्यामुळे ह्या शाळेत मुलं त्यांना जे आवडेल ते, आवडेल तेव्हा शिकतात. कोणावरही बंधनं नसतात.

ह्या शाळेत फक्त शेती शिकवली जात नाही, तर शेतीपूरक ‘पशूपालन’ आणि इतरही काही गोष्टी शिकवल्या जातात. वेगवेगळे विषय, लिहायला वाचायला शिकवलं जातं. अनिश आणि असिता यांनी २०२२ पर्यंत शाळेला शाळेच्या उत्पन्नातून सक्षम बनवायचं ठरवलं आहे.

मी ह्या शाळेबद्दल कधीच ऐकलं नव्हतं. मुलींना शेतीविषयक शिक्षण देणारी प्राथमिक शाळा बघून, त्याबद्दल ऐकून खरंच खूप छान वाटलं.

Saturday, 12 October 2019

पुणे वेध २०१९ : अतुल पेठे

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

रविवारचं पहिलं सत्रं होतं प्रसिद्ध नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं.

अतुल पेठे हे प्रसिद्ध लेखक, अभिनेता, नाट्य प्रशिक्षक, माहितीपटकार, आणि नाट्य दिग्दर्शक आहेत. पहिला प्रश्न होता, की त्यांच्या आयुष्यात नाटक आलं कुठून?

ते म्हणाले की त्यांनी लहाणपणी खूप नाटकं पाहिली. शाळेत पण नाटकांत काम करायची संधी मिळाली. त्यामुळं लहानपणीच त्यांनी ठरवलं होतं, की आपण मोठं होऊन नाटकांत काम करायचं. भाषा त्यांचा आवडता विषय होता. कॉलेजमधे असताना त्यांनी खूप साऱ्या एकांकिका लिहिल्या. या सगळ्याच्या दरम्यान जगात आजुबाजूला चालणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी त्यांना दिसत होत्या, अस्वस्थ करत होत्या. त्या अस्वस्थतेमुळे ते लिहायला लागले.

मग ते त्यांच्या काही प्रसिद्ध नाटकांबद्दल बोलले. सत्यशोधक, सुर्य पाहिलेला माणूस, व समाजस्वास्थ्य. या नाटकांच्या क्लिप्स पण त्यांनी दाखवल्या. मग ही नाटकं कशी तयार झाली, त्याच्या मागची प्रेरणा काय यावर चर्चा झाली.

त्या ४ – ५ मिनिटांच्या क्लिप्स पाहून, ह्या नाटकांना काही सांगायचं आहे, हे कळत होतं. प्रत्येकाचे विषय एकच नसले तरीही त्यांना जोडणारा दुवा एकच होता. तो म्हणजे सत्याचा शोध.

मग अतुल पेठे यांच्या माहितीपटातला, ‘कचराकोंडी’मधला एक सीन बघितला. त्या माहितीपटासाठी त्यांनी कचरा कामगारांसोबत काही वर्षं घालवली. त्या दरम्यान त्यांचं व्यक्तिमहत्वच बदललं. कचरा कामगार दिवसभर जे काम करतात, किंवा त्यांना जे करावं लागतं, ते अगदी अंगावर काटा आणणारं असतं. हे सगळं त्यांनी त्यांच्या ‘कचराकोंडी’ या माहितीपटात दाखवलंय.

जाता जाता ते एक अगदी छान विचार सांगून गेले. ते म्हणाले की टि.व्ही., चित्रपट, आणि नाटक ही माध्यमं एक सारखी नाहीयेत. टि.व्ही. हा आपल्याला नेहमीपेक्षा छोटं करून दाखवतं, चित्रपट आपल्याला ७० एम.एम. च्या पडद्यावर नेहमीपेक्षा मोठं करून दाखवतं. नाटक हे एकमेव माध्यम आहे, जे आपल्याला आहे तसं सगळं दाखवतं.

अतुल पेठे यांचं काम फारच छान आणि प्रेरणादायक आहे. ह्या सत्रात तर त्यांनी मोजक्याच नाटकांबद्दल, माहितीपटांबद्दल सांगितलं, पण प्रत्यक्षात त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी तिथे दाखलेल्या क्लिप्स बघूनच त्यांच्याबद्दल खूप उत्सुकता निर्माण झाली. मी तर त्यांचे माहितीपट, नाटकं जरूर बघणार...

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.: 7887881031

Friday, 11 October 2019

पुणे वेध २०१९ : लालसू नागोटी व उज्वला बोगामी

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

शनिवारचं तिसरं सत्र लालसू नागोटी आणि उज्वला बोगामी यांचं होतं. लालसू नागोटी हे भामरागड इथले असून ते माडिया ह्या आदिवासी जमातीतून पहिले वकिल आहेत. उज्वला बोगामी ह्या शिक्षक असून, त्यांनी इयत्ता पहिली मराठी माध्यमाच्या सर्व पाठ्यपुस्तकांचे माडिया भाषेत भाषांतर केलं आहे.

लालसू नागोटी हे मुळचे भामरागडचे. ते लहान असताना त्यांचे वडिल गेले. ते एकटे पडले. त्यावेळेस त्यांना हेमलकसाच्या बाबा आमटे यांच्या आश्रमशाळेत कोणीतरी घेऊन गेलं. तिकडे त्यांना शिक्षणाची गोडी लागली. हेमलकसातलं शिक्षण झाल्यानंतर त्यांना आनंदवनमधे शिकायला पाठवलं गेलं. आनंदवनमध्ये जितकं शिकता येत होतं तितकं ते शिकले. पुढे शिकण्यासाठी ते पुण्याला आले. ते म्हणाले, की पुण्याला येताना मी पहिल्यांदा ट्रेनमधे बसलो. त्याच्या आधी कधीच मी ट्रेनमधे बसलो नव्हतो...

फर्ग्युसन कॉलेजमधे त्यांना ॲडमिशन मिळाली. त्यांनी एम. ए. (सोश्योलॉजी) आणि एम. ए. (जर्नलिझम) अशा दोन डिग्रीज वेगवेगळ्या युनिवर्सिटीमधून घेतल्या. त्यांच्या राहण्याची सोय हॉस्टेलमधे होती. त्यांनी त्यांच्या हॉस्टेलमधली एक गंमत सांगितली. लालसू यांना जेवणात नेहमी भात लागायचा. कारण त्यांच्या गावाचं मुख्य अन्न भातच होतं. त्यांना चपाती वगैरे आवडायची नाही. पण डब्यात चपात्या आणि थोडासा भात यायचा. मग ज्यांना अजुन चपाती हवी आहे, त्यांना ते चपात्या द्यायचे, आणि त्या बदल्यात त्यांना सगळ्यांकडून भात मिळायचा. सगळ्यांसोबत हे डील ठरलेलं असायचं.

पुढे त्यांनी एल.एल.बी. पुण्याच्या आय.एन.एस. लॉ कॉलेजमधून केलं. एल.एल.बी. झाल्यानंतर ते परत भामरागडला गेले.

एल.एल.बी. झाल्यानंतर त्यांना पुण्यासारख्या शहरात नोकरी नक्कीच मिळाली असती. मग ते भामरागडला परत का गेले? ते म्हणाले की, भामरागडमधे भरपूर प्रॉब्लेम होते, आत्ताही आहेत. जेव्हा मी भामरागडला होतो, तेव्हाच ते दिसत होते, आणि त्यावर आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. म्हणून मी लॉ शिकल्यावर भामरागडला गेलो.

तिथं गेल्यावर त्यांनी बरेच उपक्रम राबवले. स्थानिक लोकांना कायद्याची जाण व्हावी म्हणून त्यांनी काम केलं. पक्षाने उमेदवार उभा करण्यापेक्षा समाजाने मिळून उमेदवार उभा करणे शक्य आहे, हे त्यांनी भामरागडमधे कृतीतून शक्य करून दाखवलं.

ते स्वतः जिल्हा परिषदेत सदस्य आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे ते सदस्यही आहेत.

उज्वला बोगामी ह्या लालसू यांच्या पत्नी आहेत, व जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका आहेत. त्यांना मराठी भाषेची विशेष जाण आहे. त्यांनी इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकांचं भाषांतर माडिया भाषेत केलं आहे. हे त्यांना कसं सुचलं? तर त्या म्हणाल्या की शिक्षिका कुठूनही असो, तिला आमच्याकडील मुलांना शिकवायला अडचण यायची. ती जर स्थानिक नसेल, तर तिची भाषा मुलांना समजायची नाही. आणि जरी ती स्थानिक असली, तरी पुस्तकामधली अवघड भाषा तिला समजावता यायची नाही. मग काही शिक्षिकांनी मिळून पाठ्यपुस्तकांच्या भाषांतराचा प्रस्ताव पाठवला, आणि ते मंजूर झाल्यावर पाठपुस्तकांच्या भाषांतराला सुरूवात झाली.

इयत्ता पहिलीची सगळी मराठी पुस्तकं त्यांनी माडिया भाषेत भाषांतरीत केली आहेत. भामरागड व जवळच्या जिल्हा परिषद शाळांमधे हीच पुस्तकं वापरली जातात.

ह्या दोघांचंही बोलणं फार प्रेरणादायक होतं. लालसू यांचा खडतर प्रवास आणि त्यांना उज्वला यांची साथ; व दोघांचंही अचाट काम त्यांच्याकडूनच माहित करून घेणं रोमांचक होतं.

हे शनिवारचं शेवटचं सत्र होतं. रविवारचं पहिलं सत्र नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं होतं. त्याबद्दल पुढच्या ब्लॉगमधे.

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.:7887881031

Thursday, 10 October 2019

पुणे वेध २०१९ : ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर

२१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबरला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".

शनिवारचं दुसरं सत्र होतं, ध्रुवांक हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर यांचं. हे दोघं सिमेंट-वाळूची घरं बांधायच्याऐवजी माती, दगड इत्यादींचा वापर करून पर्यावरणपुरक घरं बांधतात. ते म्हणाले की सिमेंट न वापरता किंवा कमीत कमी सिमेंट वापरून घरं बनवणे ही कल्पना आमची नसून ख्यातनाम आर्किटेक्ट लॉरी बेकर यांची आहे. ते भारतीय आर्किटेक्चर शिकायला भारतात आले, तेव्हा  गांधीजींना भेटले. त्यांच्याकडून लॉरी बेकर यांना असा दृष्टिकोन मिळाला की, घर बांधण्यासाठी लागणारं मटेरियल हे त्या साईटच्या काही किलोमीटरच्या परिघातून गोळा केलेलं असावं. त्याने घर पर्यावरणपुरक होण्यास मदत होते.

लॉरी यांनी ही पद्धत त्यांच्या बऱ्याच कलाकृतींमधे वापरली. त्यात प्रयोग केले. त्यासाठी स्वतः श्रम केले.

आम्ही हीच पद्धत वापरून घर बनवतो, असं ध्रुवांक आणि प्रियांका यांनी सांगितलं. साईटजवळ जे मटेरियल असेल ते वापरायचा त्यांचा प्रयत्न असतो.

पर्यावरणपुरक घरं बांधायचं त्यांचं ठरलं कधी पासून? तर कॉलेजमधे त्यांचे प्रोफेसर होते मलकसिंग गिल. ते लॉरी बेकर यांचे शिष्य होते व त्यांचाही पर्यावरणपुरक बांधकामाकडे ओढा होता. त्यांचा विषय होता आर्किटेक्चर ॲन्ड बायोलॉजी. यांच्याकडूनच ध्रुवांक आणि प्रियांका यांच्यात पर्यावरणपुरक बांधकामाची आवड निर्माण झाली. मलकसिंग गिल बऱ्याचदा त्यांच्या स्टुडंट्सना फिल्ड विजिटला घेऊन जायचे. अशाच एका फिल्ड विजिटला त्यांनी एक घर बघितलं. ते पुर्ण मातीचं होतं. आत त्या घरात राहणाऱ्या आजींनी मातीच्या भिंतीवर बांगड्या चिकटवून छान डिझाईन बनवलं होतं. ते घर, त्यातलं वातावरण, आजींचं आदरातिथ्य वगैरे बघून त्यांनी ठरवलं, की आपण अशी घरं बांधायची.

त्यांनी मलकसिंग गिल यांच्यासोबत काही काळ काम केलं. मग स्वतःचं काम सुरू केलं.

सिमेंटचा वापर कमी का करावा, याबद्दल त्यांनी सांगितलं. सिमेंट हे लाईमस्टोन, दगड इत्यादीवर रेषीय प्रक्रिया करून घडवलेलं प्रॉडक्ट आहे. त्यामुळं सिमेंटवर परत प्रक्रिया करून आपल्याला लाईमस्टोन आणि दगड मिळू शकत नाही. म्हणून सिमेंट पर्यावरणास हानिकारक ठरतं. सिमेंटचा राडारोडा जमिनीत पुरला, तरी त्याचं काहीही होत नाही. त्याचा कशालाही उपयोग होत नाही. तसंच सिमेंटने केलेलं बांधकाम टिकाऊ असतंच असं नाही. त्याचं २५ – ३० वर्षात रिनोवेशन करवं लागतं. या उलट दगड, चुना, मातीचं बांधकाम खूप टिकाऊ असतं. बऱ्याच जुन्या बांधकामांत दगड, चुना, माती वापरली गेलीये.

ध्रुवांक आणि पियांका यांचा पर्यावरणपुरक घराचा पहिला प्रोजेक्ट भोरला होता. त्यांनी त्या प्रोजेक्टची माहिती दिली, फोटोज दाखवले. अजुन बऱ्याच प्रोजेक्ट्सबद्दल त्यांनी सांगितलं.

त्यांनी आणखी एक महत्त्वाचं सांगितलं. ते म्हणाले की जेवढ्या प्रोजेक्ट्समधे आम्हाला व्यक्तिशः लक्ष घालता येईल, तेवढेच प्रोजेक्ट्स आम्ही घेतो. आम्ही ‘संख्या’ वाढवण्याऐवजी ‘गुणवत्ता’ वाढवतो.

यानिमित्ताने ‘ग्रोथ’ आणि ‘डेव्लोपमेंट’मधला फरक खूपच छान रितीने कळाला.

- शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मोबाईल क्र.: 7887881031

Wednesday, 9 October 2019

पुणे वेध २०१९ : नुपुरा किर्लोस्कर आणि जान्हवी जोशी


  • २१ सप्टेंबर आणि २२ सप्टेंबर २०१९ला, 'आय. पी. एच' प्रस्तुत आणि एम. सी. दातार क्लासेस व पळशीकर इन्स्टिट्यूट आयोजित 'वेध, पुणे' ह्या कार्यक्रमाला गेलो होतो. ह्या वर्षीच्या वेधचं सूत्र होतं, "बदल पेरणारी माणसं".


बदल 'पेरणारी'च माणसं का? घडवणारी का नाही?

आनंद नाडकर्णी म्हणाले, बदल नेहमी पेरायचा असतो. बदल घडतो. तो घडवता येत नाही. तो बीजाच्या स्वरूपात पेरला जातो. तो कधी वाढेल की नाही ह्याची शाश्वतीही नसते. तरीही पेरणारा माणूस त्या बदलावर काम करत राहतो. त्याची काळजी घेतो. तो बदल वाढू लागला की त्यावर पण काम करतो. त्याला कोणी दाद दिली, नाही दिली, त्याला काही घेणं देणं नसतं. आपल्याला नेहमी वाटतं की, बदल घडवणारी माणसं काही वेगळी असतात, महान असतात. पण असं नसतं. ती पण आपल्यासारखीच माणसं असतात. फक्त त्यांना आपली खूबी समजलेली असते. आपलं वेगळेपण समजलेलं असतं, आणि त्यावरच ते काम करत असतात. ह्या वेळचं वेधचं गाणंही तसंच होतं.

"कुंपणे तोडूनि सारी, विरघळून गेले काही
काळाने द्यावी दाद, हा हट्टही धरला नाही"

ह्या वेधला सगळी अशीच माणसं आली होती. मी प्रत्येक सत्राचा एक, याप्रमाणं ब्लॉग लिहिले आहेत. मी रोज एक, अशा प्रकारे पोस्ट करत राहीन.

पहिलं सत्र होतं, नुपुरा किर्लोस्कर आणि जान्हवी जोशी यांचं. दोघीही प्रॉडक्ट डिझाईनर आहेत. त्यांचं एक स्टार्ट - अप आहे, ब्ली टेक इनोवेशन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाचं. या कंपनी अंतर्गत ते कर्णबधिरांसाठी काही प्रॉडक्ट तयार करतात. त्यांचं प्रसिद्ध प्रॉडक्ट आहे "ब्ली वॉच". हे असं वॉच आहे जे आवाज ऐकून, ओळखून तसं वायब्रेट होतं. याची कर्णबधिरांना फार मदत होते. कोणी आपल्याला बोलवत आहे, किंवा कुकरची शिट्टी वाजत आहे, बाळ रडत आहे, अशा छोट्या पण महत्वाच्या गोष्टी त्यांना कळतात.

या प्रकारची कल्पना नुपूरा आणि जान्हवी यांना आली, ती डान्समधून. दोघी एका कथ्थकच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. तिथे एका ग्रूपने सुरेख असं सादरीकरण केलं, आणि मग सांगण्यात आलं, की हा पूर्ण ग्रूप कर्णबधिरांचा होता. त्यांची ताई पुर्णवेळ समोर उभी राहून त्यांना ठेका दाखवत होती व तो ग्रूप तिच्याकडे बघून नाचत होता.

आधी दोघींना वाटलं की शाळेतून त्यांना सादरीकरण कंपल्सरी केलं असेल. कारण जी गोष्ट ऐकूच येत नाही त्यावर डान्स करायला त्यांना कसं आवडेल? पण त्या शाळेत गेल्यावर त्यांना कळालं, की कर्णबधिरांना डान्स करायची खूप आवड असते, पण ऐकू येत नसल्याने त्यांना काही मर्यादा येतात. मग त्यांना एकजण गाणं ऐकून ठेका हाताने दाखवतो, आणि तो ठेका बघून ते डान्स करतात.

मग हेच काम करणारा बॅन्ड दोघींनी बनवला, जो ठेका दाखवायच्या ऐवजी तसा हातात वायब्रेट होतो. त्यामुळे त्यांची अवलंबता कमी झाली. त्यांना कुठंतरी बघून नाचायच्या ऐवजी स्वतःहून डान्स करता आला. हा त्यांनी कॉलेज प्रोजेक्ट म्हणून पुर्ण केला. त्यातूनच त्यांना 'ब्ली वॉच'ची कल्पना आली. आणि हळूहळू करत त्यांनी त्यांच्या वॉचमधे रिदमसोबतच आणखी विविध फिचर्स ॲड केले.

तसंच त्यांनी 'ब्ली टिव्ही' नावाचं ॲप बनवलं. ज्यात कर्णबधिरांसाठी खास चिन्हभाषेमधे माहितीपुर्वक विडियो असतात. यात आजवर काहीशे विडियोज उपलब्ध आहेत. नुपुरा आणि जान्हवी यांनी सांगितलं, की कर्णबधिरांना ऐकू येत नसल्यामुळे त्यांना बऱ्याच लहान सहान गोष्टींची माहिती नसते. त्यासाठी त्यांनी हे ॲप बनवलं.

हे सगळं त्यांनी कसं केलं यावर ते बोलले. त्यांचे अनुभव, गमती जमती, अभिमानाचे क्षण त्यांनी शेअर केले. त्या म्हणाल्या की, कर्णबधिरांना हियरिंग एडची गरज असते असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात त्यांच्याशी बोलल्यावर कळालं त्यांना त्याची गरज नसते. त्यांना ऐकायची सवय नसते. त्यामुळे अचानक ऐकू यायला लागलं की त्यांना कळेनासं होतं. आवाज डोक्यात फिरतात. त्यामुळं ते हियरिंग एड्स वापरत नाहीत. दोघी म्हणाल्या, आपण जेव्हा एका विशिष्ट वर्गासाठी काम करतो, तेव्हा त्यांचे अनुभव, त्यांची मतं लक्षात घेणं खूप महत्त्वाचं असतं. दोघींचंही चिन्हभाषेवर प्रभुत्व आहे.

या सत्रातून नवा दृष्टिकोन मिळाला. 'ज्यांना ऐकू येत नाही त्यांच्यासाठी हिअरिंग एड' असं साधं समीकरण आपल्या डोक्यात असतं. पण त्याचाही पलीकडे काही असू शकतं हे ह्या सत्रात कळालं. एका साध्या कल्पनेचं, एका कंपनीमधे रूपांतर कसं होतं, एक एक टप्पा कसा वाढत जातो, हे मला कळालं.


लेखक : शंतनु शिंदे
ई-मेल : shantanuspune@gmail.com
फोन नं.: 7887881031

Wednesday, 2 October 2019

शाई पेन

पहिल्यांदा शाई पेन वापरायला मिळालं, तेव्हा कसं वाटलं होतं हे मला अजुनही आठवतंय... मला शाई पेन हवं असा मी हट्ट धरला होता. मग मला अट घालण्यात आली की, जेव्हा मी सलग दोन (ए - ४ साईज) पानं भरून लिहिल, तेव्हा मला शाई पेन मिळेल. त्या नंतर काहीच दिवसांनी मी पाच ए - ५ पानं भरून माझ्या मनात येईल तसं सलग लिहिलं, आणि बाबांना दाखवलं.

थोड्याच दिवसांनी मला छान रॅप केलेला बॉक्स मिळाला. त्यात होतं 'हिरो' कंपनीचं ब्राऊन आणि गोल्डन कलरचं एक शाईपेन!

असा प्रत्येकाचा काही ना काही किस्सा असतो. प्रत्येकाची शाई पेनशी संबंधित अशी आठवण असते असं मला वाटतं; आणि २९ तारखेला शाई पेनांचं प्रदर्शन बघायला गेल्यावर हा विचार पक्काच झाला.

हो. २९ सप्टेंबरला स्वप्नशिल्प - श्रेयस बॅन्क्वेट्स इथे 'द पुणे फाऊंटन पेन शो २०१९' झाला. आत जाण्याआधी एन्ट्री करायला सुद्धा शाई पेन देण्यात आले. आम्ही आत गेलो... आणि खेळण्याच्या दुकानात गेल्यावर छोट्या मुलाचं व्हावं तसं आमचं झालं.

१३ देशातले २५ हून अधिक ब्रॅन्ड्सचे पेन त्या प्रदर्शनात होते, आणि ते हाताळायलाही परवानगी होती! त्यामुळे प्रत्येक पेनाचा फील घेता येत होता.

पूर्वी चौथीनंतर शाळेत शाई पेन वापरणं कंपल्सरी असायचं. इतर कोणतंही पेन वापरू दिलं जायचं नाही. पण जसं जसं बॉल पेन आणि जेल पेन यांचं प्रस्थ वाढलं, तसं शाई पेनचा वापर कमी झाला. आता कोणी रोज शाई पेन वापरत नसलं, तरी चांगल्या हस्ताक्षरासाठी, सुलेखनासाठी शाई पेन 'मस्ट' आहे. हा विचार रुजवण्यासाठी, शाई पेनांचा वापर वाढवण्यासाठी, आणि त्यांचे विविध प्रकार सगळ्यांना बघायला मिळावे, म्हणून हे प्रदर्शन होतं.

आता तिथे ठेवलेल्या पेनांबद्दल बोलायचं, तर खूप सारे ब्रॅन्ड होते. उदाहरणार्थ, जर्मनीचे वाल्डमन (Waldmann), जपानचे उरुशी स्टुडियो (Urushi Studio), पॅरिसमधून वॉटरमॅन (Waterman), यु.एस.ए.ची प्रसिद्ध कंपनी पार्कर (Parker), जर्मनीची फॅबर कॅसल (Faber - Castell), ऑनलाईन (Online), आणि इतर खूप... प्रत्येकाची स्वतःची स्पेशॅलिटी होती. काहींचे फायबरचे पेन होते. काहींचे लाकडी पेन होते, काहींचे मेटलचे पेन होते. काहींचे पेन ट्रान्सपरंट होते, काहींचे पेन हॅन्ड पेंटेड होते. मटेरियलपेक्षाही प्रत्येकावरची कलाकुसर बघण्यासारखी होती. काही पेन वीतभर लांब होते, तर काही पेन बोटाएवढे पण नव्हते. थोडक्यात बघायला खूप व्हरायटी होती. सोबत शाईच्या बाटल्या (दौत), कार्ट्रेज, निब पण होत्या. निबचे वापरानुसार प्रकार होते. शाईच्या बाटल्यांचे वेगवेगळे आकार, प्रकार होते. आम्हाला तिथून एक पुस्तिका मिळाली, ज्यात पेन, शाईच्या बाटल्या, शाई, निब, इत्यादी बद्दल भरपूर माहिती आहे.

खूप मजा आली. शाई पेनमधे इतके प्रकार असू शकतात, असं वाटलं नव्हतं... माझ्यासोबत माझे बाबा पण होते. खूप माहिती मिळाली. मी रोज वापरत नसलेले शाई पेन आठवले.

ह्या सगळ्यासाठी मी आयोजक केअर स्टेशनर्सचे आभार मानतो. हा एक मस्त असा अनुभव होता. 

Wednesday, 22 May 2019

पास्कल


एवढ्यात ओडिसा, पश्चिम बंगाल इथं मोठं चक्रिवादळ येऊन गेलं. त्याचं नाव 'फॉनी'. ह्या चक्रिवादळातल्या वाऱ्यांचा वेग २२० किमी प्रति तास इतका होता. ह्यात बरीच वित्तहानी झाली असली तरी जिवितहानी बोटावर मोजण्याइतकीच झालीये, ही आनंदाची बाब.


असो. सांगायचा मुद्दा असा, की मी ह्या चक्रिवादळावर earth.nullschool.net ह्या साईटमार्फत लक्ष ठेवत होतो. ह्या साईटवर मला चक्रीवादळाचा वेग, तो नक्की कुठं आहे, हे सगळं दिसत होतं. दरम्यान ती साईट एक्सप्लोर करताना मला असं कळालं की, त्या साईटवर जी उंची सिलेक्ट करू, त्या उंचीवरच्या वाऱ्यांची माहिती मिळते. मी बघितलं, तर उंची ‘hPa’ ह्या एककात होती. मी जरा नेटवर शोधलं, आणि मला ‘पास्कल (pascal)’ ह्या एककाबद्दल माहिती मिळाली. ‘hPa’ म्हणजे ‘हेक्टोपास्कल’.

पास्कल हे हवेचा दाब मोजण्यासाठीचं आंतरराष्ट्रीय मेट्रिक एकक आहे. एक पास्कल म्हणजे, एका चौरस मीटरवर पडलेला एक न्यूटन इतका भार. शंभर पास्कल्स म्हणजे एक हेक्टोपास्कल (hectoPascal - hPa). एक हजार पास्कल्स (किंवा दहा हेक्टोपास्कल्स) म्हणजे एक किलोपास्कल (kiloPascal - kPa). एक हजार किलोपास्कल्स म्हणजे एक मेगापास्कल (megaPascal - mPa), आणि एक हजार मेगापास्कल्स म्हणजे एक गिगापास्कल (gigaPascal - gPa).

हवेचा दाब साधारणपणे हेक्टोपास्कल किंवा किलोपास्कलमधे मोजतात. समुद्रपातळीला हवेचा दाब 1013.25 hPa (हेक्टोपास्कल) असतो. जशी उंची वाढत जाईल, तसा हवेचा दाब कमी होत जातो. त्यामुळं उंची सांगताना जितकी जास्त उंची, तितके पास्कल्स कमी होणार.

आता एक मजा सांगतो. त्यासाठी मला ‘बार’ ह्या अजून एका दाब मोजायच्या एककाविषयी माहिती द्यावी लागेल. ‘बार’ हेही मेट्रिक एकक आहे. फक्त फरक इतका, की १ बार = १,००,००० पास्कल्स... म्हणजे १,००,००० न्युटन्सचा भार एका चौरस मीटरवर दिल्यास त्याला एक बार म्हणता येईल. आणि मी सांगत होतो ती मजा म्हणजे, सी.एन.जी हे इंधन जे सध्या बऱ्याचशा वाहनांमधे वापरता येतं, ते २०० बार्स इतकं कॉम्प्रेस्ड असतं... म्हणजे २००x१,००,००० पास्कल्स... विचार करा... गाडीच्या डिक्कीत बसवलेल्या एका टाकीत आपण २०० बार्स इतका कॉम्प्रेस केलेला सी.एन.जी घेऊन फिरत असतो...

पास्कल हे फक्त हवेचा दाब मोजण्यासाठी नाही वापरत, तर ह्या एककाचा बऱ्याच गोष्टीसाठी वापर होतो. पृथ्वीतल्या विविध थरांमधला दाब मोजण्यासाठी गिगापास्कल्स वापरले जातात. 

इलॅस्टोग्राफी अंतर्गत माणसांच्या काही स्नायूंचा कडकपणा – मऊपणा मोजण्यासाठी किलोपास्कल्सचा वापार केला जातो.

इंजिनीयरिंगमधे पदार्थांचा दणकटपणा, लवचिकता, कडकपणा मोजण्यासाठीही मेगापास्कल्स वापरले जातात. अशा अनेक गोष्टींमधे पास्कल वापरला जातो. 

आधी हवामानशास्त्रात पास्कलच्या जागी ‘बार’ वापरला जायचा, पण जशी आंतरराष्ट्रीय मानकं ठरवली गेली, तसं बऱ्याच जणांनी ‘बार’ सोडून दिला. पास्कल वापरायला सुरूवात केली. पी.एस.आय (psi) पाउंड्स पर स्क्वेअर इंच हे एककही बरंच वापरलं जायचं. पण पास्कल, बार सारखी मेट्रिक एककं आल्यावर ह्या इंपेरियल पद्धतींचा वापर कमी झाला...

बघा, कुठली गोष्ट कुणाला कुठे घेऊन जाईल, काही सांगता येत नाही. एका चक्रिवादळाने मला दाब मोजायच्या दोन एककांशी ओळख करून दिली. एक पास्कल आणि दुसरा बार. 

असो, ही सगळी माहिती विकीपिडिया (Wikipedia)वरून घेतली आहे. आकडे तपासले आहेत. माहिती उपयोगी पडली असेल अशी आशा करतो. 

धन्यवाद
लेखक : शंतनु शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com
मो. क्र. : 7887881031

Monday, 20 May 2019

ग्रह, तारे, ऋषी, नेब्युला, आणि बरंच काही...

११ मे, शनिवारी मी स्टारगेझिंगच्या प्रोग्रामला गेलो होतो. 'मिती फाऊंडेशन' आणि 'असिमित स्पेस ॲन्ड एन्वॉईर्मेंट सेंटर'ने ह्या प्रोग्रामचं आयोजन केलं होतं. आमचे फॅकल्टी होते, सारंग ओक सर. त्यांनी खूपच छान पद्धतीने समजावलं. सोबतचे वॉलेंटियर्सही खूप हेल्पफुल होते. मला इथे टेलिस्कोप हाताळायला पण मिळाला. ह्या प्रोग्रामचं टायमिंग होतं ११ मे सायंकाळी. ६ ते १२ मे सकाळी. ५ ... १० - ११ तास मी आकाश निरिक्षण करत होतो...

सगळ्यात पहिल्यांदा सप्तर्षी किंवा उर्सा मेजर हे नक्षत्र बघितलं. हे नक्षत्र बरंच महत्वाचं आहे. ह्या नक्षत्राच्या आधारे बरीच आणखी नक्षत्रं शोधता येतात, आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे ध्रुवतारा शोधता येतो. ह्या नक्षत्राला 'सप्तर्षी' का म्हणतात, ह्याची कथा सारंग सरांनी सांगितली.

पूर्वी जंगलात सात ऋषी राहायचे. त्या सातही जणांची लग्नं झालेली होती. पण कालांतराने सहा ऋषींच्या बायका त्यांना सोडून गेल्या. त्यातल्या एका ऋषींची बायको तेवढी राहिली. त्या ऋषींचं नाव 'वशिष्ठ' व बायकोचं नाव 'अरूंधती'! सप्तर्षी नक्षत्रातले सात तारे हे ते ऋषी आहेत. (सप्त + ऋषी = सप्तर्षी) त्यातल्या सहाव्या ताऱ्याचं नाव 'वशिष्ठ' आहे. वरवर बघितल्यास तो एक तारा वाटतो, पण नीट नुसत्या डोळ्यांनी बघितल्यावरही लक्षात येतं की ते दोन तारे आहेत. त्यातला एक म्हणजे वशिष्ठ आणि दुसरा अरूंधती. टेलिस्कोपमधून बघितल्यावर तर आणखीनच स्पष्ट दिसतं.

असं म्हणतात की पूर्वी, मुलीचं लग्न ठरलं, की मुलीला हे दोन तारे वेगळे दिसताहेत का असं विचारण्यात यायचं. ते वेगवेगळे दिसले की डोळे ठणठणीत आहेत असं समजायचे. ही एक प्रकारची 'आय-टेस्ट' होती!

सप्तर्षी नक्षत्रावरून आम्ही ध्रुवतारा बघितला. ध्रुवतारा ओळखायला दोन पद्धती आहेत. 'सप्तर्षी' नक्षत्रावरून ध्रुवतारा ओळखता येतो तसंच 'कॅसिओपिया' किंवा 'शर्मिष्ठा' नक्षत्रावरूनही ध्रुवतारा ओळखता येतो. ध्रुवतारा हा उत्तर धृवाच्या बरोब्बर वर आहे. उत्तर धृव ते दक्षिण धृव अशी काल्पनिक काठी घुसवली, तर तो पृथ्वीचा अक्ष होईल. त्यामुळे उत्तर धृवावरचा हा ध्रुवतारा, पृथ्वीवरून हलताना दिसत नाही. उत्तर गोलार्धावरच्या सगळ्यांना हा तारा उत्तर दिशा दाखवतो. दक्षिण गोलार्धावरून हा तारा दिसत नाही. विषुववृत्तावरून बघितलं तर हा तारा क्षितिजाजवळ दिसतो.

सप्तर्षी नक्षत्रावरूनच आम्ही स्वाती नक्षत्र बघितलं. मग चित्रा, मग हस्त नक्षत्र बघितलं. फक्त सप्तर्षीवरून आम्ही अजून तीन नक्षत्रं बघितली. त्याच बरोबर आम्ही बोटांच्या आधारे ताऱ्यांमधलं दृष्य अंतर मोजायला पण शिकलो.

आम्ही गुरू (ज्यूपिटर) बघितला. दुर्बिणीतून गुरूवरचे पट्टे आणि चार चंद्र पण दिसत होते. चौघांनी गुरूला अगदी 'चार चॉंद' लावले बघा! शनिकडे बघितलं तर त्याचे कडे पण दिसत होते. नुसत्या डोळ्यांनी काहीच फरक दिसत नव्हता, पण टेलिस्कोपमधून बघितल्यावर दोघांमधला फरक दिसत होता.

आम्ही फक्त ग्रह तारेच बघितले नाहीत, तर नेब्यूला, जिथे ताऱ्यांचा जन्म होतो, ते पण बघितले.

नेब्यूला नुसत्या डोळ्यांना दिसायला अवघड असतात. टेलिस्कोपमधून बघितल्यावर एक ताऱ्यांचा गुच्छ दिसतो. त्यातले काही तारे ठळक असतात, तर काही पुसट असतात. त्यांच्या आजुबाजूला धुळीचा ढग असतो. 'ब्ल्यू लगून नेब्यूला'मधे तो निळसर दिसतो, तर 'डम्बेल्स नेब्यूला'मधे तो राखाडी दिसतो. 'डम्बेल्स नेब्यूला' खरंच डम्बेल्ससारखा दिसतो, पण तसा आकार दिसायला खूप अंधार लागतो, असं मला कळलं.

आम्ही आकाश निरिक्षणाच्या मधेमधे काही ॲक्टिव्हिटीज् करत होतो. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला एक चंद्राचा मॅप देण्यात आला. प्रत्यक्ष आकाशात दिसणारा अर्धा चंद्र मॅपमधल्या पुर्ण चंद्रातला नक्की कुठला अर्धा भाग आहे, हे ओळखायचं होतं. त्यासाठी तिथं असलेले सगळे (तीन) टेलिस्कोप चंद्राकडे लावण्यात आले होते. सगळ्यांनी उत्साहाने ही ॲक्टिव्हिटी पार पाडली.

दुसरी ॲक्टिव्हिटी होती, दिलेल्या कागदावरील नक्षत्र ओळखणे व त्यातल्या ताऱ्यांमधले दृष्य अंतर मोजणे. ही ॲक्टिव्हिटीही उत्साहाने पार पाडण्यात आली. सारंग सर जेव्हा उत्तर सांगत होते, तेव्हा तर सगळ्यांचा उत्साह ओसांडून वाहत होता!

सारंग सरांनी एक प्रेझेंटेशन पण दिलं. त्यात त्यांनी मुख्यतः पृथ्वीसारखे अजुन ग्रह आहेत का? एखाद्या ताऱ्याभोवती फिरणारा ग्रह कसा शोधला जातो? पृथ्वीसारखा जर ग्रह असला तर तो किती लांब असेल? आपल्याला तिथपर्यंत पोचता येईल का? अशा प्रश्नांची उत्तरे दिली. ते म्हणाले की, पृथ्वी हा ग्रह अपघाताने तयार झाला आहे. त्यावरची जीवसृष्टी एक अपघात आहे.

मुख्य म्हणजे आपली पृथ्वी प्रदक्षिणा घालते ती सूर्याभोवती, जो एकटा आहे. विश्वातले जवळजवळ ८५ टक्के तारे हे 'दुकटे' म्हणजेच डबल आहेत. हे तारे एकमेकांभोवती फिरतात. आपण अशा दुकट्या ताऱ्याभोवती फिरत असतो तर काय झालं असतं विचार करा. एका सूर्याची उष्णता आपल्याला सहन होत नाही...

दुसरं म्हणजे आपण सूर्यापासून अशा अंतरावर आहोत, की ज्यामुळे पृथ्वीवर जास्त उष्णता नसते, की जास्त थंडी नसते. वातावरण पण स्थिर असतं. वादळं आपल्याकडे फार होत नाहीत. आपल्याकडे पाणी पण मुबलक आहे. हा सगळा अपघात आहे, असं काही शास्त्रज्ञ मानतात, सारंग सर म्हणाले.

ह्यानंतर सारंग सरांनी पृथ्वीवरच्या समस्यांवरच्या शॉर्ट्फिल्म्स दाखवल्या. त्या फिल्म्समधे पृथ्वीवरच्या पाण्याची समस्या, वाढतं तापमान, वातावरणात वाढत असलेलं कार्बन वायूचं प्रमाण, वाढत्या समुद्रपातळीची समस्या आणि असं बरंच काही दाखवलं होतं.

मग त्यांनी विचारलं, की मागच्या स्लाईड्स आणि आत्ताच्या ह्या शॉर्टफिल्म्स, ह्यामधे काही सबंध दिसतोय का? ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास का करायचा हे ह्यातून कळतंय का?

ह्याचं उत्तर एका छोट्या मुलाने दिलं.

"ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास केल्याने आपण किती छोटे आहोत आणि आपली पृथ्वी किती मौल्यवान आहे हे कळतं!"

कुठेही पृथ्वीसारखा ग्रह नाही, असला, तरी तो आपल्यापासून काहीशे, काही हजार, काही लाख प्रकाशवर्ष दूर असणार. इतका जवळ तर तो ग्रह नक्कीच नसणार, की इथून उठलो आणि त्या ग्रहावर गेलो.

आणि समजा आपल्याला पाहिजे तसा ग्रह सापडला. लांब असला तरी आपण प्रकाशाहून जास्त वेगाने तिथे पोहोचू शकलो. (प्रकाशाचा वेग : ३ लाख किलोमटर प्रति सेकंद) तरी तिथपर्यंत जाण्याचा खर्चच इतका असणार की काही मोजकेच लोक तिथं जाऊ शकणार.

एवढं सगळं असूनही आपण आपले नैसर्गिक घटक वाट्टेल तसे वापरतो. वाट्टेल तसं पाणी वापरतो, वाट्टेल तितकी झाडं कापतो, वाट्टेल तितकी हवा दुषित करतो, वाट्टेल तितकं पाणी दुषित करतो. आपल्या ग्रहाचं मुल्य कळावं म्हणून ॲस्ट्रॉनॉमी शिकणं गरजेचं आहे. "ॲस्ट्रॉनॉमी आपल्याला 'हम्बल' करते", सारंग सर म्हणाले.

माझ्यासाठी ही कल्पना अगदी डोळे उघडणारी व एकदम नवी होती. त्यामुळे हा स्टारगेझिंगचा प्रोग्राम माझ्यासाठी स्पेशल होता.

Wednesday, 24 April 2019

वेळ आणि मी

थंड अशी ती रात्र होती. माझा बेड संध्याकाळीच आवरून ठेवलेला होता, पण मी बराच वेळ उभाच होतो. थोड्यावेळाने, जरा रागानेच, मी बेडपाशी आलो, आणि सरतेशेवटी अंग टेकलंच. मी अंग टेकलं, म्हणून बराच वेळ आवरून बसलेला बेड, त्याने सोडलेला उसासाही मला ऐकू आल्यासारखा वाटला. मीही बराच वेळ उभा होतो, म्हणून उसासा सोडला, हात-पाय ताणले.

थोड्यावेळाने मी डोळे मिटले, तर अचानक मी उडतोय, असं मला वाटायला लागलं. डोळे पण उघडता येत नव्हते. बराच वेळ मी कुठे आहे, मी खरंच उडतो आहे का, डोळे का उघडता येत नाहीत, हे जाणायचा प्रयत्न केला, पण काही कळलं नाही.

मग, काही न करता शांतपणे वाट पाहू, असा विचार करतो न करतो, तोच माझं डोकं कुठेतरी जोरात आपटलं. कळ आली. थोड्यावेळाने डोळे उघडतो, तर... अरेच्चा! डोळे उघडले की! पण... हे कुठे आलो? वर उंचावर कौलारू असं छत होतं. अंगाखाली लाल रंगाचा गालिचा होता. हवा थंड होती; आणि बाजूला नजर टाकली तर..... बुकशेल्फ? हो! बुकशेल्फच! त्या बुकशेल्फमधे खूप सारी पुस्तकं होती. मी आडवा पडलेलो उठून उभा राहिलो. चारी बाजूला बुकशेल्फ्स होते. एका बाजूला दरवाजा पण होता. बघू तर दरवाज्यामागे काय आहे, असं म्हणत मी दरवाज्याचा नॉब फिरवला तर, दार उघडत नव्हतं! मला लगेच घाम फुटला! कधी नव्हे इतकी भिती वाटली!! मला कधीही इतकी भिती वटत नाही, पण कोंडलं की खूप भिती वाटते...! तेही एका अनोळख्या ठिकाणी...!

मी परत एकदा चौफेर बघितलं. विरुद्ध दिशेला आणखी एक दरवाजा होता. मी भीत भीतच त्या दरवाज्याचा नॉब फिरवला, आणि फिरला की!

माझी भिती एकदम उडाली! पण जितक्या लवकर ती उडाली, तितक्या लवकर ती परतही आली. ह्या दरवाज्याच्या पलिकडे काय असेल? भितीमिश्र उत्सुकतेने मी दरवाजा उघडला आणि... बापरे! एवढा मोठा हॉल? भिंती ब्राऊनिश रंगाच्या, छत आधीसारखंच उंच, पण मेंटेंड. हवा थंडगार, पायाखाली लाल रंगाचा गालिचा. सगळीकडे ब्राऊन रंगाचं फर्निचर, खिडक्या जुन्या पद्धतीच्या, त्यांना लाल वेल्वेटचे पडदे.

मुख्य गोष्ट म्हणजे, हॉलच्या मधोमध एक ब्लेझर घातलेला, उंच, धष्टपुष्ट असा माणूस बसला होता. विलक्षण गोष्ट म्हणजे, तो त्याच्या दुर्बिणीतून, त्याच्या समोर असलेल्या खिडकीतून, लांबवर काहीतरी बघत होता, आणि काहीतरी एक्सप्रेशन देऊन, कागदावर काहीतरी लिहित होता. कोण आहे हा? असा काय लिहितोय? आणि सगळ्यात महत्वाचा मला पडलेला प्रश्न होता, ‘मी कुठे आहे?’

थोडा वेळ मी तसाच उभा होतो. मग त्या माणसाच्या जवळ जाऊन त्याला हाक मारली, “हलो! मी कुठंय हे तुम्हाला माहिती आहे का? तुमचं नाव काय”? पण त्या माणसाने प्रतिसाद दिला नाही. विचित्रच प्रसंग होता तो! मी त्या माणसाच्या अवती-भोवती फिरतोय, आणि तो त्याच्या कामात व्यस्त आहे...!

शेवटी बऱ्याच वेळच्या शांततेनंतर मी अस्वस्थ झालो. काय करावं? मी निर्दय होऊन त्या खिडकीच्या समोर उभा राहिलो. त्या माणसाने बघितलं, आणि एकदम जड आवाजात खेकसला, “ए! बाजूला हो!” अरे! मी ह्याला हाका मारतोय, हा मला प्रतिसाद देत नाही, आणि वरून माझ्यावरच खेकसतोय? कोण आहे कोण हा माणूस?

शेवटी मी राग आवरून, त्याच्या टेबलजवळ जी एक्स्ट्रॉ खुर्ची होती, ती ओढली आणि त्यात बसून त्या माणसाला विचारलं, “तुमचं नाव काय? तुम्ही इथे काय करताय? माफ करा, मी स्पष्टच विचारतोय पण मला काही कळत नाहीये. ही कुठली जागा आहे?”

त्या माणसाने माझ्याकडे नीट बघितलं, आणि जड आवाजात म्हणाला, “हे माझं ऑफिस आहे.”
“तुम्ही कोण?” इति मी.
“माझं नाव ‘वेळ’...!”

वेळ?

“तोच मी, ज्याला तुम्ही घड्याळ्याच्या माध्यमातून समजून घेता.”

पण हा माणूस म्हणजे वेळ? सुटाबुटातला? टेबलवर बसून, दुर्बिणीतून बघितलेलं कागदावर लिहिणारा?

मी जरा धाडस करून, त्यांना विचारलंच, “तुम्ही हे काय करताय?”
त्यांनी माझ्याकडे परत बघितलं आणि म्हणाले, “मी ‘माझं’ व्यवस्थापन कोण कसं करत आहे ते बघून, त्याचं भविष्य वर्तवतोय.”

मला एकदम ‘अरे बापरे’ असं झालं.

“म्हणजे कसं?” मी परत एकदा धाडसाने.
“म्हणजे कसं?” असं बोलून त्यांनी थेट माझ्या डोळ्यात बघितलं, आणि “ओके, तुला सांगतो.” असं म्हणून माझ्या हातात दुर्बिण दिली आणि म्हणाले, “खिडकीतून बाहेर बघ.....”

मी एकदा मिस्टर टाईमकडे (तेवढ्यात मी त्यांना मिस्टर टाईम म्हणायचं ठरवलं) आणि दुर्बिणीकडे बघितलं, आणि डोळ्यांना दुर्बिण लावून बघितलं, तर....... एक फाटके कपडे घातलेला माणूस दिसला.

“तो माणूस दिसतोय?” इति मिस्टर टाईम.
“हो!”
“तो अत्यंत प्रतिभावान असा लेखक होता.”
“बर?”
“हो. पण तो अत्यंत आळशी होता. प्रॅक्टिस करायचा नाही. ‘माझं’ व्यवस्थापन करायचा नाही. मग शेवटी बऱ्याच वर्षांनी तो असा झाला. तो आता लिहिणं पण विसरलाय...”
“बापरे!”
“हो. आणि तो माणूस बघ.”
मी बघितलं. हा माणूस अत्यंत सुखवस्तू होता.
“त्या माणसाकडे अजिबात स्किल्स नव्हते. पण तरी, ‘माझं’ नियोजन करून, त्याने खूप स्किल्स मिळवले. आणि त्याच पद्धतीने, तो आता पैसे पण मिळवतोय.”

मी आपलं मान डोलावत होतो. मग माझ्याकडे बघून मिस्टर टाईम म्हणाले, “हे बघ, तू मला भेटायला आलाच आहेस, तर सांगतोच. जो ‘माझं’ व्यवस्थापन नीट करत नाही, तो कधीही यशस्वी होत नाही. हा शाप नाही, तर माणसांच्या जगातला नियम आहे, कळलं?”

मी मान डोलावली. काम करायला लागलेले मिस्टर टाईम, परत माझ्याकडे बघून म्हणाले, “तुला सांगायचं आणखी एक मुख्य कारण. काल तुझे बाबा तुला हेच समजावून सांगत होते ना? पण तरी, ते तुला रागावले म्हणून तू चिडलास ना? आठवली का ती रात्र?”

मी शुन्यात बघायला लागलो. ते बाबांचं सगळ्यात पहिल्यांदा ओरडणं, मग ते नियोजनाबद्दल बोलले, पण मी रागातच होतो... ती रात्र, ते डोकं...... त्या प्रसंगाचं आठवून, शुन्यात लागलेले माझे डोळे, ते इथे येणं आठवून खडबडून जागे झाले, आणि जणू माझ्या डोक्यातलं ओळखून मिस्टर टाईम म्हणाले, “तो दुसरा दरवाजा आता उघडेल. काळजी करू नको. पण लक्षात ठेव. वेळेचं नियोजन नीट करायचं, नाहीतर यश नाही. कळलं?”

मला आता घरी जायची घाई लागली. उठून उभं राहता राहता मी “ओके मिस्टर टाईम!” म्हणालो. धावत त्या आधीच्या दरवाज्यापाशी आलो, धावत धावत तो नॉब धरणार इतक्यात...

दारावर डोकं आपटलं. कळ आली. डोळ्यासमोर अंधारी आली. डोळे मिटले. थोड्यावेळाने डोळे उघडतो तर... अरेच्चा! हे आपलंच छत! आपला फॅन, आणि बेड असा वर का दिसतोय? ओ! आपण बेड वरून खाली पडलो तर...!

हे स्वप्न होतं तर!!

Tuesday, 16 April 2019

'मी' आणि 'मी'


लेखक : शंतनु शर्मिष्ठा शिंदे
मो.क्र. : 7887881031
ईमेल : shantanuspune@gmail.com

दुपार आणि संध्याकाळच्या मधली अशी ही वेळ होती, म्हणजे चार किंवा साडे चार वाजले होते. बालगंधर्वच्या स्टॉपला थांबलो होतो. तेवढ्यात अगदी बस स्टॉपच्या जवळून एक कळकट ट्रक खूपसारा धूर मारून गेला. मी पटकन रूमाल काढून तोंड पुसलं. तेवढ्यात दोन ‘मी’ प्रकट झाले… घाबरू नका… हे दोघंही माझ्या ओळखीचे होते. ते दोघं होते, ‘मन’ आणि ‘मेंदू’. हे दोघे प्रकट झाले, की मी नुसता ऐकतो.

मेंदू नाक दाबून म्हणाला, “काय हे!”
मनानं न्युट्रली विचारलं, “काय?”
“केवढा हा धूर!”
“मग? रस्त्यावर उभे आहोत, असं होणारच!”
“होणारंच काय? केवढा धुर उडवून गेला ट्रक बघितलं ना?! सगळा कार्बन मोनॉक्साईड! किती धूर मारत असेल हा दिवसभर! ह्याच्यामुळे पर्यावरणावर काय परिणाम होतो माहितीये ना?
“आता ट्रकला काय करणार? त्याला लागतंच एवढं डिझेल…”
“का? का लागतं? जर बसला सीएनजी चालू शकतं, तर ट्रकला न चालायला काय झालं?”

मनाला काय बोलावं काही कळेनासं झालं. थोडा पॉज पडला. मग मनाने बोलायला सुरूवात केली, “कार्स आणि बसेसला सीएनजी वापरतात, ट्रकला पण वापरू शकतो, मग टू-व्हिलर्सचं काय? आणि पुण्यात तर टू-व्हिलर्सचीच संख्या जास्त आहे…”

“सायकल्स अल्टरनेटिव ऑप्शन म्हणून आहेतच…”
मन तोंड वाकडं करून म्हणालं, “हॅ! आता बघ, आपल्याला घरून इथं, बालगंधर्वला यायचं असेल प्रोग्रामसाठी, तर सायकलने किती वेळ लागेल! एक तास आधी निघालो तरी नाही पोचायचो!”
“मग पर्यावरणपूरक म्हटलं, तर इलेक्ट्रिक स्कूटर आहे.”
“मग अशा भारी गाड्या कधी चालवायच्या माणसानं? असं मस्त गाडी घेऊन ---”
“हे बघ,” मेंदू समजूतीच्या सुरात म्हणाला, “प्रत्येक माणसाने त्याला योग्य ती गाडी घ्यावी आणि गाडी घेताना पर्यावरणाचा विचार करावा. आपण झाडं कापतोय, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण करतोये, हे कंट्रोलमधे यायला नको? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, क्रूड ऑईलचा पण साठा मर्यादित आहे. तो संपला, की पेट्रोल, डिझेल बनवणार कसं?”


हे त्यांचं बोलण संपलं, तेवढ्यात बस आली, आणि मी चढलो.

बसप्रवास : एक हमखास अनुभव

बसप्रवास करताना हमखास अनुभवता येणारं वातावरण (मी चांगलं किंवा वाईट म्हणत नाहीये, मला फिरताना कसं वाटतं, हे मी मांडतोय...)
✍ लेखक : शंतनु शर्मिष्ठा शिंदे
ईमेल : shantanuspune@gmail.com

मी शेअर रिक्षा करून स्वारगेटला उतरतो. रिक्षा उभी राहते, तीच मुळात एका बसमागे. स्वारगेटचा मेन बस स्टॉप, जिथे साधारणपणे सगळ्या बसेस थांबतात, तिथं रस्ता खूप मोठा आहे. रात्रीच्या वेळेला तो कळून येतो, पण दिवसभर तो माणसं, रिक्षा, टमटम, बसेस यांनी भरून गेलेला असतो. रिक्षा जिथं थांबते, तिथं समोर बस उभी असते. ती जागा सोडली तर बाकीच्या तिन्ही बाजूला सगळं मोकळंच असतं. तिकडून इतर रिक्षा, माणसं, बसेस, वगैरे या सगळ्यांचं येणं जाणं चालू असतं. मुळात समोरचीच बस, जिचा आश्रय घेऊन रिक्षावाल्या दादांनी रिक्षा थांबवलेली असते, तीच कधी हलेल याचा भरवसा नसतो. त्यामुळे सगळ्या बाजूंचा अंदाज घेत मी उतरतो आणि पटकन दादांना पैसे देऊन बाजूच्या गर्दीत शिरतो. त्या गर्दीतल्या माणसांचे अनंत प्रकार. त्यातले काही ग्रामीण भागातले वाटतात, काही शहरी, काही ‘भैया’, तर काही माणसं कुठली, हेच कळत नाही. (महाराष्ट्रीय नाहीत एवढंच काय ते कळतं...) त्या गर्दीत मग मी बसची वाट बघत थांबतो. काही बसेस येऊन जातात, त्या अगदी बॉम्बमधे दारूगोळा भरावा तशा भरलेल्या असतात. कुठल्याही क्षणी त्यांचा स्फोट होईल असं वाटत असतं. अशीच सगळी मजा बघत असताना मला हवी असलेली बस येते. मी अगदी हर्षभरित होऊन, तिचा ‘साईज, डिस्टन्स, स्पीड’ एकंदरीत लक्षात घेऊन ती नक्की कुठे थांबेल आणि तिचा मागचा दरवाजा कुठे असेल तिथं अंदाजाने थांबतो. पण तो अंदाज फोल ठरतो. बस नेहमी एकतर बरीच पुढे जाऊन थांबते, नाहीतर मागेच थांबते. मग मी (उन्हामुळे) गेलेला राहिलेला सगळा जोर लावून मागच्या दरवाज्याकडे धावतो, पण त्याचा सहाजिकच काही उपयोग नसतो. पहिली गोष्ट दरवाज्याबाहेर आधीच गर्दी जमलेली असते आणि धक्काबुक्की सुरू झालेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे बसच्या आतमधे, दरवाज्याबाहेर जितकी माणसं उभी असतात त्याच्या दसपट वीसपट आधीच कोंबलेली असतात. तरी मी नेहमी जोशात आत घुसतो, कंडक्टरांसारखाच आवाज काढून “चला पुढे सरका!” असं ओरडून स्वतःसाठी जागा करून घेतो, तिकिट काढून अवघडून उभं राहतो, आणि जिथं उतरायचं असतं तिथे उतरून फक्त उत्सुकतेपोटी मागं कुठली बस आहे बघितलं, की कळतं आपण ज्या रुट नंबरच्या बसमधून आलो, त्याच रुट नंबरची बस मागोमाग आलेली असते, आणि ती पूर्णपणे मोकळी असते...

Friday, 5 April 2019

फरश्यांचं रहस्य

कपिल दादा उर्फ कपिल धांदरफळे नेहमीप्रमाणे शनिवारी अकरा वाजता आपल्या मित्राकडे जायला निघाला. कपिल दादा एका कंपनीत काम करतो. शनिवार - रविवार सोडून नऊ ते पाच त्याला काम असतं. शनिवार-रविवार तो आपल्या जुन्या-नव्या आणि आवडत्या मित्रांना भेटतो. त्यापैकी सगळ्यात आवडत्या अशा मित्राला भेटायला तो आज निघाला. स्वारगेट जवळच त्याच्या मित्राची खोली होती. कपिल दादा कात्रजवरून व्हाया पुणे-सातारा रोड तडक मित्राच्या घरी पोचला. दारावरच एक मोठी प्रिंटाऊट लावली होती. त्यावर लिहिलं होतं --

बौद्धिक माणसाच्या मूलभूत गरजा
- अन्न - वस्त्र - निवारा
- स्मार्टफोन/लॅपटॉप-इंटरनेट

आणि

शांती…!

कपिल दादाने दरवाजा ढकलला आणि म्हणाला, “काय मस्त गरजा आहेत रे तुझ्या!”

नेहमीप्रमाणे, समोरच वाघेश दादा आपल्या बेडवर, लॅपटॉप मांडीवर घेऊन बसला होता. बाजूला अंथरूण-पांघरूण पडलं होतं. खिडक्या बंद होत्या. वाघेश दादा नुकताच झोपेतून उठल्या सारखा वाटत होता.

वाघेश दादा, एक अजबच रसायन आहे. तो कपिल दादासारखा नोकरीला जात नाही, फ्रीलान्स काम करतो. मासिकांसाठी वगैरे लेख लिहायचे, ट्रान्सलेशन्स करायचे, व्हिडिओज बनवून युट्युब वर टाकायचे, कुठे कुठे जाऊन वॉल पेंटिंग करायचे, गोष्टी लिहायच्या, अशी त्याची कामं असतात. एका भाड्याच्या खोलीत एकटाच राहातो. त्यामुळे त्याच्या गरजा कमी असतात. कधीही गेलं तरी तो नेहमी हसतमुख असतो. त्याच्या खोलीत दरवाजातून आत गेल्यावर उजवीकडे एक टेबल, तर समोर एक बेड असतो. टेबल वर काही पुस्तकं असतात. टेबलवर एक लॅपटॉप किंवा एक फोन नेहमी चार्जिंगला असतो. टेबल पाशी एक खुर्ची असते.

त्याच्या बिझी किंवा फ्री असण्याचं गणित त्याच्या कामावर अवलंबून असतं. तो सोमवारी दुपारी १ वाजता झोपेतून उठू शकतो किंवा रविवारी पहाटे उठून काम करू शकतो. अतिशय फ्लेक्झिबल माणूस…

कपिल दादांची चाहुल लागून वाघेश भाऊंनी लॅपटॉपमधून तोंड आजिबात वर न काढता विचारलं, “कुठल्या गरजा?”

“त्याच की दरवाज्यावर लावलेल्या!”
“अच्छा, त्या होय! प्रत्येकाच्या त्याच गरजा असतात… मी काय वेगळाय?”
“चल! फक्त अन्न, वस्त्र, निवारा ह्या तीन गरजांवर जगणारी माणसं पण आहेत जगात!!”
“आहेत की! मी कुठे नाही म्हणतोय! म्हणूनच मी आधीच लिहिलंय, बौद्धिक माणसाच्या गरजा म्हणून.”
“अच्छा, बर?”
“मग काय तर! तुझ्याच बाबतीत विचार करू आपण. मी फक्त तुझ्या राहण्याची, खायची, आणि कपड्यांची सोय करतो. राहू शकशील तुझ्या फोनशिवाय, कॉम्प्युटरशिवाय?”

कपिल दादा मनातल्या मनात म्हणाला, याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही. याच्याकडे प्रत्येक मुद्दे तयार असतात. त्यानी लगेच विषय बदलला,

“मग बाकी काय? काय करतोयस?” कपिल दादाने विचारलं.
“काही नाही. सध्या काही काम नाहीये, पुढच्या काही दिवसांत येईल.”
“आत्ता काय करतोयस विचारलं. तुला एवढं भेटायला आलो, लांबून, आणि तू माझ्याकडे साधं बघत पण नाही?”
“अरे, आपल्याला बोलायलाच एक भारी विषय शोधून ठेवला होता. आत्ताच हरवाय, तो शोधतोय.”
“कुठला विषय?”
“एक सनसनाटी न्यूज आहे. आजचा पेपर वाचला?”
“हो! पण आजच्या पेपरमधे काय विशेष आहे?” कपिल दादाने कपाळावर आठ्या आणत आजच्या पेपरमधलं ‘सनसनाटी’ आठवायचा प्रयत्न केला.
“एक छोटीशी बातमी आहे, पण इंटरेस्टिंग आहे. ऐक -” वाघेश दादा म्हणाला. कपिल दादा सावरून बसला.
“टायटल आहे, बिबवेवाडी भागात ‘फरशी’ची चोरी!
“अरे हो! मी ही बातमी वाचलीये! काय विचित्र ना? बाकी काही चोरायचं सोडून चोर फरशी काय घेऊन गेला?” कपिल दादा उद्गारला.
“अगदी बरोबर!” वाघेश दादा उठून येरझाऱ्या घालू लागला. “ह्या चोराने शुक्रवारी मध्यरात्री किंवा पहाटे १ – २च्या दरम्यान बाकीचं काहीही चोरायची संधी असताना छिन्नी हातोडा वापरून फरशी चोरली. घरमालक आवाजाने जागे होऊन बाहेर येईस्तोवर चोराने फरशी हातात घेतली होती.

“मालक बाहेर येईस्तोवर चोराने फरशी काढली होती? छिन्नी हातोड्याचे आवाज ऐकूनही मालक एवढ्या उशिरा उठले? असे कसे घरमालक…?”

हे ऐकून वाघेश दादा नुसता गालातल्या गालात हसला.

“आतून कोणीतरी बाहेर आलंय म्हटल्यावर चोराने फरशीचा तुकडाच फेकून मारला असंही लिहिलंय ना त्यात?” कपिल दादाने विचारलं.
“हो. मालक चोराचं वर्णन फार करू शकले नाहीत, पण ते म्हणतात की चोराला खूप मोठी, म्हणजे छातीवर रेंगाळणारी दाढी होती. सहाजिकच आहे. आजुबाजूला खूप अंधार असणार. त्यात काही बाकीचं दिसलं नसणार. मालक म्हणतात आमचं घर तळमजल्यावर असल्याने चोर पटकन पळून गेला.”

“कसलं विचित्र ना? भितीदायक. असा लांब दाढीचा चोर, फरशी चोरतो, आणि कोणी आल्यावर फरशीचाच तुकडा फेकून मारतो! बापरे!” कपिल दादाने  शहारे आल्यासारखं केलं.

“हं, पण इंटरेस्टिंग वाटतंय. त्या चोराने फरशी का चोरली असेल?” वाघेश दादा कपाळावर आठ्या घालून टेबलच्या खुर्चीवर बसला.

“मी पण जरा विचार केला, पण काही समजलं नाही. काय कारण असू शकतं?”

कपिल दादाने प्रश्न विचारला, पण वाघेश दादा केव्हाच दुसऱ्या जगात पोचला होता. विचार करायला लागला की तो असाच वेगळ्या जगात हरवत असे. तो बराच वेळ असा बसला. कपिल दादाला त्याचा मूड माहित असल्याने त्याने फार त्रास दिला नाही. त्याने लॅपटॉप उचलला आणि ती बातमी परत वाचली. ती बातमी वाचून होते न होते तोच इकडे वाघेश दादा ताड्कन उठला आणि कपडे घालू लागला. कपिल दादाने आश्चर्याने विचारलं, “काय रे? कुठे चाललास?”

“अरे चल की चहा पिऊन येऊ! इथे बसून काय करणारेस? चल!”
“असंच, झोपेतून उठल्या-उठल्या, ब्रश वगैरे करणार नाहीयेस का?”
वाघेश दादा हसून म्हणाला, “माझं आवरून झालंय. आंथरूण-पांघरूण आवरायचं आहे.”

****

दोघंही बाहेर पडले. चहा प्यायला स्वारगेटच्या स्टॅन्डला आले. कपिल दादाने चहा पिताना विचारलं फरशीच्या चोरीबद्दल, पण वाघेश दादाने काही सांगितलं नाही. चहा पिऊन झाल्यावर कपिल दादा, वाघेश दादाच्या खोलीवर जायला वळणार इतक्यात वाघेश दादाने त्याला ओढलं. ते दोघं अप्पर, कात्रजच्या बसेस लागतात तिकडे गेले. अप्परची बस पकडली. वाघेश दादाने वसंत बागेचं तिकिट काढलं. कपिल दादा काही वैतागून बोलणार इतक्यात वाघेश दादा म्हणाला, “मला आत्ताच एक आयडिया सुचलीये. काही बोलू नको. ज्यांच्याकडं चोरी झालीये त्यांच्याकडे जाऊ. त्यांना काही प्रश्न विचारू. आता मी शेरलॉक आणि तू वॉटसन…!”

कपिल दादा डोळे वटारून बघतच राहिला…

दोघंही वसंतबागेला उतरले. बिबवेवाडी – कोंढवा रोडवरच ती सोसायटी होती. दोघंही गेले. सोसायटी तशी बऱ्यापैकी जुनी होती. तळमजल्यावरंच एकांच्या घराचा दरवाजा उघडा होता. आत काही माणसं बोलत होती. वाघेश दादाने बेल वाजवली आणि विचारलं, “ती फरशीची चोरी झाली ती याच घरात का?”

आतल्या सगळ्या माणसांनी वळून दोघांकडे बघितलं. त्यातले एक वयस्कर आजोबा म्हणाले, “होय, हेच ते घर, तुम्हाला काय पाहिजे?”
वाघेश दादा म्हणाला, “आम्ही इथे चोरी झाली ते पेपरमधे वाचलं आणि आलो. त्यात लिहिलं होतं ना की चोराने घरमालकावर हल्ला केला फरशीचा मोठ्ठाला तुकडा फेकून, म्हणून जरा बघायला आलो, काय भानगड आहे ते. जरा काळजी वाटली हो…”

कपिल दादाने आश्चर्याने क्षणभर वाघेश दादाकडे बघितलं. फरशीचा मोठ्ठाला तुकडा फेकून ‘हल्ला’ म्हणे…

त्या वयस्कर आजोबांनी दोघांना आत घेतलं. ती फरशीची जागा दाखवली. दरम्यान त्या हॉलमधे बसलेली दोघंही मुलं जोरात आत पळून गेली. वाघेश दादाने त्या आजोबांना विचारलं, “चोरी नेमकी किती वाजता झाली?”
आजोबा जरा आठवून म्हणाले, “मी उठलो तेव्हा साधारण १ वाजला होता. तोपर्यंत चोराने फरशी हातात घेतली होती.”

“अच्छा… मग त्या चोराने तुम्हाला तुकडा फेकून मारला का? ह्म्… बरं, ती फरशी काही विशेष होती का? म्हणजे त्यावरचं डिझाईन वगैरे असं काही होतं का ज्याने तिची किंमत वाढेल?” वाघेश दादाने विचारलं.

आजोबा डोकं खाजवत म्हणाले, “हम्… मला तरी आठवत नाही. त्या फरशीची किंमत काही फार नव्हती. अशी बारीक रंगीत खडी असलेली साधी फरशी होती ती. पण हा… ती इथे मध्यभागी लावली होती, कारण तिच्यात जरा मोठे आणि लाल-लाल खडे होते. तिच्यावर एक… हा! त्या फरशीवर ‘6’ असा आकडा पण होता. कदाचित साच्यामुळेच पडला असेल तो. पण काहीही म्हणा, आता बराच खर्च करावा लागणार. अशा रंगीत खडीच्या फरश्या आता मिळत नाहीत. आता सगळ्या घराच्या फरश्या बदलाव्या लागणार…” आजोबांनी उसासा सोडला. “२००० साली बसवल्या होत्या फरश्या. चांगल्या चालल्या होत्या, पण हे असलं काहीतरी विचित्र घडलं. आणि योगायोग बघा! आमचे एक मित्र आहेत. मुकूंदनगरलाच राहतात. आम्ही दोघांनी एकत्रच घरं विकत घेतली. त्यांनी बंगला बांधला, आणि मी फ्लॅट घेतला. त्यांच्याही घरातून काही दिवसांपुर्वी अशीच फरशी चोरी झाली!”

“अरेऽ बापरे! त्यांची फरशी महागडी तर नव्हती ना?” वाघेश दादाने विचारलं.
“नाही हो!” आजोबा खाली बसत म्हणाले, “अशाच पद्धतीची होती ती फरशी. तिच्यावर पण काहीतरी आकडा होता. काय होता बरं तो? थांबा, मी त्यांना फोन करून विचारतो.”

आजोबांनी फोन केला, आणि विचारून वाघेश दादाला सांगितलं. “त्या फरशीवर ‘5’ आकडा होता म्हणे…”

इकडे वाघेश दादाचे डोळे चमकायला लागले. तो लगेच घाईघाईने कपिल दादाला ‘चल’ म्हणाला आणि आजोबांना म्हणाला, “माहिती देण्यासाठी धन्यवाद. तुमची तब्येत चांगली आहे, हे बघून छान वाटलं. पुन्हा भेटू…!” आणि दोघं सोसायटीमधून बाहेर पडले. इकडे आजोबा आणि त्यांची दोन नातवंडं (आजोबांच्या मागून) डोळे वटारून बघत होते.

इकडे कपिल दादाला काही कळत नव्हतं. त्याने वाघेश दादाला विचारलं, “अरे, तुला काही कळालंय आहे का? काही सांगत का नाहीस?”
वाघेश दादा वसंत बागेच्या दिशेने चालत म्हणाला, “एक जबरदस्त क्ल्यू मिळालाय. आता एक काम करू. इथंच कुठंतरी मस्तपैकी जेऊ. घरी जाऊ, झोप काढू, आणि मग एक, ह्याच केस संदर्भात फोन करायचा आहे, येरवडा जेलमधे…”

“ह्या ‘केस’ संदर्भात, ऑ?” कपिल दादाने मिश्किलपणे विचारलं, “पण येरवडा जेलमधे का? कोण ओळखीचं आहे का?”
“हो. मित्र आहे एक. तिथं काम करतो. का फोन करायचा ते नंतर सांगतो. आधी जेऊया…”

दोघंही जवळच्या हॉटेलला गेले. ऑर्डर दिली आणि जणू काही झालंच नाही मघाशी, अशा पद्धतीने वाघेश दादाने विषय बदलला. तो मागच्या काही दिवसांचं त्याचं क्रियेटिव्ह काम दाखवू लागला. कपिल दादा पण केसबद्दल विसरला. वाघेश दादाचं काम खरंच खूप आणि छान होतं. थोड्यावेळाने दोघं घरी गेले. झोपले.

कपिल दादाला जरा जास्तच गाढ झोप लागली. तो उठला तेव्हा वाघेश दादा ऑलरेडी काम करत बसला होता. खिडक्यांमधून संधिप्रकाश येत होता. वाघेश दादा म्हणाला, “ए कपिल, चल उठ. माझा येरवड्याला कॉल झाला. चहा पण रेडी आहे. चल प्यायला.”

कपिल दादा काही बोलणार इतक्यात दरवाज्याची बेल वाजली. वाघेश दादा वैतागून म्हणाला, “आता कोण आलं?” त्याने दार उघडलं तर दाढी वेडी वाकडी कापलेला एक माणूस उभा होता. “काय पाहिजे?” वाघेश दादाने विचारलं. तो माणूस क्षण दोन क्षण वाघेश दादाकडे बघत राहिला. मग तोंड कसनुसं करत, “दोन दिवसांपासून उपाशी आहे होऽ जरा पोटाला काईतरी…” असं म्हणून तोंड आणखीनच कसनुसं केलं. वाघेश दादाने पण जरा त्या माणसाकडे रोखून पाहिलं, आणि एकदम कपिल दादावर ओरडला, “अरे ए कपिल! झोपला कायेस? चल उठ!! आंथरूण उचल आणि आतून ह्या माणसाला द्यायला खाऊ आण! आंथरूण उचल पहिल्यांदा!”

इकडे कपिल दादा दचकले. हे का नविन? त्याने लगेच आंथरूण उचललं, आणि आतून काही बिस्किटं आणली. वाघेश दादाने ती बिस्किटं त्या माणसाला दिली. तो माणूस अत्यानंदाने गेला.

इकडे वाघेश दादा कपिल दादाला सॉरी म्हणाला. कपिल दादा म्हणाला, “अरे ते सॉरी सोड! पण नक्की उठवलं का?” वाघेश दादा काही म्हणाला नाही. थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, “आज आपल्या केसचा क्लायमेक्स आहे. कपिल, एक काम कर. आज रात्री इकडेच रहा. बघ आत्ता वाजलेत ६. थोड्या गप्पा मारू. मग फिरायला जाऊ. नंतर आपल्याला काय करायचं आहे ते सांगतो.”

तासाभराने दोघं बाहेर पडले. खाऊन, पिऊन, मजा करून दोघं, साधारण १२ वाजता घरी आले. वाघेश दादाने कपिल दादाला गेट पाशी थांबवलं आणि वर जाऊन खोलीचा दरवाजा बघून परत आला. म्हणाला, “अजुन फरशी-चोर आला नाहीये.”
“पण फरशी-चोर आपल्याकडे का --”
“श्श!” वाघेश दादा ओरडला. “ऐक, आत्ता काही बोलू नको. आपण ह्या गेटच्या दोन बाजूंना लपून राहू. अनोळखी माणूस आला की मला कळेल. कदाचित चोर येणार नाही, असंही होईल, पण आला की --”

वाघेश दादाने कपिल दादाला सगळा प्लॅन सांगितला. दोघंही लपून बसले. अर्धा तास झाला, कोणीही नाही. पाऊण तास झाला, कोणीही नाही. वेळ हळू हळू सरकत होता. साधारणपणे एकूण दिड तास झाल्यावर, बाहेर पसरलेल्या वाळूवर पावलं वाजली. दोघांनाही चाहूल लागली. दोघं अत्यंत ताठ आणि शांत बसले. तो माणूस सरळ आत जाऊन पायऱ्या चढायला लागला. वाघेश दादाने खूण केली. दोघांनीही पाठलाग केला. माणूस बरोब्बर जाऊन वाघेश दादाच्या खोली पाशी थांबला होता. कुलूप तोडायचा प्रयत्न करत होता. दोघंही त्याची हालचाल, बऱ्यापैकी लांब उभे राहून बघत होते. साधारण पंधरा मिनिटांनी त्याला कुलूप तोडण्यात यश आलं. तो आत गेला.

मागून दोघं हळूच वर आले. आणि दाराच्या दोन्ही बाजूला लपले. तो चोर खोलीच्या बरोबर मध्याभागी जाऊन बसला आणि त्याने त्याच्या झोळीतून छिन्नी हातोडा काढला, टॉर्च काढला. छिन्नीला जिथं ठोके मारतात, तिथं कापड गुंडाळलेलं होतं. इकडे वाघेश आणि कपिल दादांमधे नेत्रपल्लवी झाली. दोघं नीट बघू लागले. त्या चोराने अत्यंत कुशलतेने फरशी काढायला सुरूवात केली. हळू हळू ठोके देत त्याने पुर्ण फरशी मोकळी केली आणि अलगद वर काढली. फरशी झोळीत घालून तो चोर बाहेर पडणार इतक्यात कपिल दादाने लाईट लावली आणि वाघेश दादाने चोराला घट्ट पकडलं.

“कपिल! कपिल!! पटकन बेडवरची दोरी घे…” चोर हात – पाय झाडू लागल्यावर वाघेश दादा ओरडला. कपिल दादाने व्यवस्थित त्या चोराला बांधलं आणि “हाश हूश” करत दोघं बेडवर चोरासमोर बसले. बाजूलाच त्यांनी चोराची झोळी ठेवली. चोर आणि वाघेश दादा बराच वेळ एकमेकांकडे खूनशी नजरेने बघत होते. मग वाघेश दादा म्हणाला, “कसा आहे आपल्याकडे संध्याकाळी आलेला भिकारी उर्फ फरशी चोर उर्फ रघूवीर किष्टेपूरकर उर्फ २००० सालचा कुख्यात ज्वेल थिफ?”

कपिल दादा वाघेश दादाकडे अगदी कोड्यात असल्यासारखा बघत होता.

सकाळी कपिल दादाने पोलिसांना फोन करून बोलावलं. ते चोराला घेऊन गेले. वाघेश दादाच्या खोलीमधल्या त्या फरशीत काही माणकं (Ruby) मिळाली. ह्या फरशीच्या कोपऱ्यात ‘7’ आकडा होता. ते माणकं पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

कपिल दादा म्हणाला, “हे बघ. आता तरी तुला माझ्या प्रश्नांची उत्तर द्यावी लागतील. तुला कसं कळालं त्या आणि आपल्या फरश्यांमधे मौल्यवान खडे आहेत? तो आपल्याकडे आलेला भिकारीच खरा चोर आहे हे तुला कसं कळालं?”

वाघेश दादा हसला, म्हणाला, “अरे सोपं होतं. जेव्हा मी ती बातमी वाचली तेव्हाच मला वाटलं होतं की त्या चोरी झालेल्या फरशीचं काहीतरी महत्व आहे. त्या फरशीची चोराच्या दृष्टीने किंमत खूप जास्त आहे. इतरांना ती माहीत नाही. नाहीतर कशाला कुठलाही कलंदर चोर फरशी काढण्याइतकं अवघड काम करेल? मग मी आपल्या फरश्यांकडे बघितलं. ह्या, सिमेंटमधे रंगीत रेती घालून बनवलेल्या फरश्या. म्हटलं की, यात कोणी एखाद्या रेतीच्या मोठ्या खड्या ऐवजी कुठलं तरी रत्न टाकलं, तर काय डोंबलाचं कळेल? आपण थोडी उकरून बघणार? पण ती बिबवेवाडीतल्या आजोबांकडे झालेली चोरी नेमकी याच बेसीसवर झाली, हे सांगण्याइतपत माझ्याकडे काही पुरावा नव्हता. म्हणून आपण त्यांच्याकडे गेलो.

“त्यांच्याकडे सेम फरश्या आहेत बघितल्यावर माझ्या शंकेतला एक लेअर निघून गेला. जेव्हा ते म्हणाले की आमच्या फरशीत लाल-लाल मोठ्ठे खडे होते, तेव्हा शंकेतला दुसरा लेअर गेला. आणि जेव्हा ते म्हणाले की, त्यांच्या मित्राकडे पण अशीच चोरी झाली, तेव्हा माझी खात्रीच झाली. कारण बघ ना, सेम खडे असलेल्या दोन फरश्या अंदाजे एकाच आठवड्यात चोरी झाल्यात. हा चोर एकच असणार हेही मी ताडलं. तसंच तो एक कुशल गवंडी असणार, कारण इतर बऱ्याच फरश्यांमधून एक अखंड फरशी काढणं काही सोपं नाही. जर त्याने खरंच फरश्यांमधे रत्न लपवले असतील, तर आधी तो फरश्यांच्या कारखान्यात काम करत असणार, तसंच त्याने केलेली ही रत्नांची चोरी खूप आधीची गोष्ट असणार. कारण आता अशा फरश्या तयार होत नाहीत, आणि ते बिबबेवाडीतलं घरही बरंच जुनं आहे. त्यांनी नक्कीच एवढ्यात फरश्या बदललेल्या नसणार.

मग माझ्या डोक्यात विचार सुरू झाला की, ह्या चोराला पकडायचा कसा?

मग मला आठवलं की, आजोबा म्हणाले होते चोराला खूप मोठी दाढी होती. आता कोणी मुद्दाम दाढी, छातीवर रेंगाळेपर्यंत वाढवेल का? खासकरून चोर, ज्याला वाटतं, की आपल्याला कोणी ओळखू नये? तो सर्वसामान्यासारखा दिसायचाच प्रयत्न करणार ना? मग माझी खात्री पटली की तो चोर बरीच वर्ष जेलची हवा खाल्लेला असणार. मग मी ठरवलं, आधी येरवडा जेलला फोन करू. तिकडून काही मिळालं नाही, तर इतर मार्ग शोधू…

“पण माझं काम झालं! येरवडा जेलमधून भिकारी उर्फ फरशी चोर उर्फ रघूवीर किष्टेपूरकर उर्फ २००० सालचा कुख्यात ज्वेल थिफ, याची माहिती मिळाली.

त्याकाळी झालं असं, की या रघुवीर किष्टेपूरकराने १९९५ साली एक मोठी चोरी केली. तो आधी गवंडी होता. अत्यंत कुशल. माझा पहिला तर्क चुकीचा होता. तो कारखान्यात काम करायचा नाही. खूप मोठ्या मोठ्या घरांमधे त्याला दुरूस्ती वगैरे कामासाठी बोलवायचे. अशाच एका घरात तो दुरूस्तीसाठी गेला आणि काही माणकं घेऊन आला.

दुर्दैवाने त्या माणकांच्या चोरीबद्दल त्याला शिक्षा झाली नाही. मग त्याने आणखी काही घरांमधून चोरी केली. ज्वेलथिफ म्हणून तो पटकन प्रसिद्ध झाला, पण पकडला नाही गेला. त्या रिलेटेड मी बरेच जुने पेपर वाचले. बरेच महिने, हा ज्वेल थिफ कसा दिसायचा, हे पण कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे त्याचं गवंडीचं काम पण चालू होतं. त्याच्याकडे चोरीच्या ‘एकसे एक’ भारी कल्पना असायच्या. पण तरी, मला वाटतं, त्याला पकडलं जाण्याची भिती पण होती. त्यामुळं त्याने ही भारी गोष्ट केली असणार. तो एक गवंडी होता. तो एका फरश्यांच्या फ्रॅक्टरीमधून वरच्या वर लॉटने फरश्या विकत घेत असणार. त्याने ही माणकं फॅक्टरीला देऊन, ते माणिक फरश्यांमधे घाला अशी ऑर्डर दिली असणार. विचारलं, तर सांगितलं असेल की, खोटे खडे आहेत, गिऱ्हाईकाने घालून मागितलं आहे. त्या फरश्या मिळाल्यावर, त्याने त्या काही घरांमधे ‘पेरल्या’ असणार. म्हणजे आता तो पकडला गेला, तरी त्याच्या घरून त्या फरश्या कोणाच्या हाती लागणार नव्हत्या. त्या फरश्या कुठं आहेत, त्याचं रेकॉर्डही त्याच्याकडे राहणार होतं. त्या माणकांची गरज भासली, किंवा जेलमधून आल्यावर नंतरच्या आयुष्याची सोय करायची असेल, तर जाऊन फरश्या चोरायच्या. चोरायला सोपं पडावं, म्हणून त्याने ह्या फरश्या, घरांच्या हॉलमधे बसवल्या असणार.

मग एका नेहमीच्या चोरीत बिचारा किरकोळ गोष्टीमुळे पकडला गेला. बाकी सगळा माल जप्त झाला पण पोलिसांना ते माणिक जप्त नाही करता आले. त्याने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्या माणकांची चोरी केली, पण मग नंतर ते हरवले. बऱ्याच कोर्ट-कचेऱ्यांनंतर, त्याला जन्मठेप झाली. काही कारणास्तव कैद काही वर्ष वाढली.

“जशी त्याची कैद संपली, काही दिवसांपुर्वी, तसं त्याने ठरवलं असणार की, आपले माणिक परत मिळवायचे. त्याने कदाचित माणिक घातलेल्या दहा फरश्या करून घेतल्या असणार. स्पेशल ऑर्डरच्या असल्यामुळे त्यावर १ ते १० आकडे असणार. १ ते ४नंबर फरश्यांचं आपल्याला माहित नाही. पण आधी ५नंबर फरशी त्याने चोरली. मग बिबवेवाडीतली ६ नंबर. आणि मग पाळी होती ७ नंबर फरशीची. जेव्हा त्या बिबवेवाडीतल्या आजोबांनी फरश्यांवरचे आकडे सांगितले, तेव्हाच माझ्या लक्षात आलं की, आता आपल्याकडची ७ नंबर फरशी चोरण्यात येणार.

“पण माझा अंदाज फार लवकर खरा ठरला. मी रघुवीरचा फोटो बघितला असल्याने, मला तो लगेच ओळखू आला आणि त्याला ती फरशी दिसावी आणि तो मोहात पडावा म्हणून मी तुला काल उठवलं. त्याला फरशी दिसली, आनंद झाला, आणि काल रात्रीच तो आला… बाकीचं तुला माहितीये…!”

कपिल दादा कौतुकाने बघतच राहिला. थोड्या वेळाने त्याला वाचा फुटली. “पण तुला ते जुने वृत्तपत्र, ज्वेलथिफचा फोटो वगैरे कधी आणि कसं मिळालं?“

वाघेश दादा मिश्किलपणे हसला आणि म्हणाला, “अर्थातच इंटरनेटवर! काही गोष्टी माझ्या येरवडा जेलमधे काम करणाऱ्या मित्राने पाठवल्या, तर काही मी स्वतः शोधल्या. तू झोपलेला असताना घडलं हे सगळं...!

लगेच कपिल दादा म्हणाला, “अच्छा, म्हणून ते दरवाज्यावर लावलं आहे का, इंटरनेट एक मुलभूत गरज आहे म्हणून?”

दोघंही मनमुराद हसले…